पुणे : ‘भारतीय विज्ञानात शाश्वत विकासाचे मूळ आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (१४ मे) पुण्यात केले. ‘
भारतीय ज्ञानाचा खजिना’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, पुस्तकाचे लेखक प्रशांत पोळ, स्नेहल प्रकाशनाचे रवींद्र घाटपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘भारतीय विज्ञानाचा पाया शाश्वत विकासावर आधारित आहे. यामध्ये कला, शास्त्र, खगोल, भूगोल, गणित, भूमिती, यांत्रिकी, गती अशा अनेक शास्त्रांचा अभ्यास करण्यात आला आहे. तो अतिशय शास्त्रशुद्ध आहे. पाश्चिमात्य देशाकडून शास्त्र आणि विज्ञान आपल्याकडे आले आहे, असा आपला समज आहे; पण या सर्व शास्त्रांचा विचार भारतीय विज्ञानात केला गेलेला आहे.’
‘भारतीय विज्ञानात एकात्म भाव आहे. निसर्गाशी साधर्म्य आहे. हा भाव निसर्गाचे जतन आणि संवर्धन करणारा आहे. या भावाची या पुस्तकात केलेली मांडणी अतिशय चांगली आहे. ही मांडणी नव्या पिढीला आपल्या विज्ञानाबाबतची नवी माहिती देऊ शकेल. तरुण पिढीला प्रेरित करील,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
‘भारतातील विविध शास्त्रे अतिशय प्रगत होती. त्यासाठी भारतीय वैज्ञानिक ज्या परिमाणांचा वापर करत होते. त्याचा अभ्यास केला असता आपल्याला आजही थक्क व्हायला होते. सुश्रुत यांनी प्लास्टिक सर्जरीबाबत केलेले संशोधन किंवा धातुशास्त्राबाबात केलेली प्रगती ही भारतीय विज्ञान प्रगत असल्याची चिन्हे आहेत. यावर अजून संशोधन आणि लिखाण होण्याची आवश्यकता आहे,’ असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. ‘भारतीय विज्ञान अतिशय प्रगत होते हे प्रशांत पोळ यांनी पुराव्यासहित सिद्ध केले आहे. त्यांचे हे पुस्तक भारतीय विज्ञानाकडे आपल्याला नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास भाग पाडते. त्यांचे हे पुस्तक नव्या पिढीला अतिशय उपयुक्त आहे,’ असेही फडणवीस म्हणाले.
या वेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, डॉ. गो. बं. देगलूरकर यांचीही भाषणे झाली. लेखक प्रशांत पोळ आणि प्रकाशक रवींद्र घाटपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आरती आत्रे यांनी, तर आभारप्रदर्शन आदित्य घाटपांडे यांनी केले.